खानापूर : हबनहट्टी परिसरातील खनिज (बॉक्साईट) वाहतूक आणि कथित चोरी प्रकरणावरून खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित करत सर्व संबंधित विभागांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हबनहट्टी परिसरातून दररोज ५० ते ५० टन क्षमतेच्या ओव्हरलोड वाहनांची वाहतूक होत असून त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा पंचायत (PRED) विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी (AEE) खानापूर तहसीलदारांना पत्र लिहून ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खराब होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर कोणती कारवाई झाली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
खनिज लीज मंजूर करताना ज्या मार्गांवरून वाहतूक होणार आहे, त्या रस्त्यांच्या वापरासाठी नियमांनुसार संबंधित यंत्रणेकडे निधी जमा करण्यात आला आहे का, असा सवालही करण्यात आला आहे. या संदर्भात पीडब्ल्यूडी आणि पीआरईडी विभागाकडून नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, तसेच संबंधित रक्कम भरली गेली आहे का, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदार, पोलीस, आरटीओ, पीडब्ल्यूडी आणि पीआरईडी विभाग या प्रकरणात मौन का बाळगत आहेत, असा सवाल उपस्थित करत ब्लॉक काँग्रेसने प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली आहे.
याशिवाय, हबनहट्टी खनिज लीज प्रकरणात माईन्स अँड जिऑलॉजी विभागाकडून लॅटराईटऐवजी बॉक्साईट उत्खननास परवानगी दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी स्तरावर निष्पक्ष व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित विभाग किंवा अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.
