बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आषाढी एकादशीचे औचित्य साधून ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील आणि रविंद्रनाथ जुवळी उपस्थित होते.
कार्यक्रमात आबासाहेब देसाई यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विषद केले. पांडुरंग कारकल यांनी प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यानंतर रविंद्रनाथ जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, सुरेंद्र देसाई, अशोक कदम, विजय वाईगडे, विजयमाला पाटील, माणिक हुद्दार आणि एस. एस. वाडकर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
तसेच विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे, योगिनी देसाई, अरविंद मुतकेकर आणि सुरेश प्रभू खानोलकर यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभंग सादर करत वारकरी परंपरेचा भक्तिरस अनुभवायला दिला.
यावेळी भरत गावडे व चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता सादर केल्या, तर विश्वास धुराजी यांनी वारीतील आपल्या अनुभवांचे कथन करून उपस्थितांना वारकरी परंपरेचे महत्त्व सांगितले.
ज्ञान, भक्ती आणि मनोरंजनाचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
