पांडुरंगाच्या चरणी सीमाप्रश्न सोडविण्याचे साकडे; मराठी भाषिकांना न्याय मिळावा, पुणे विभाग समितीची मागणी
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेल्या सीमाभागातील मराठी कार्यकर्त्यांनी पांडुरंगाच्या चरणी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घातले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुणे विभाग समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या कथित अन्यायाचा उल्लेख केला. मराठी संस्कृती आणि भाषेचे अस्तित्व टिकून राहावे तसेच मराठी माणसावर होणारी कन्नड सक्ती थांबावी, यासाठी कर्नाटक प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
तसेच 1956 पासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच विरोधी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आणि इतर राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी गणपती पाटील, विनोद वीर, मारुती पाटील, कुमार पठाण, संतोष कुंभार, रवी जाधव, प्रमोद तसेच खानापूर तालुका आणि सीमाभागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
