लिखित परीक्षेत शहरातील ७,८०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आयोजित आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी जीजीसी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय सामान्यज्ञान लिखित परीक्षेत शहरातील २८ शाळांमधील तब्बल ७,८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे होते. प्राचार्य व्ही. एन. जोशी आणि पांडुरंग नायक हे गौरव अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण सभागृहाने वंदे मातरम् गायन केले. मंगल कुलकर्णी यांनी प्रार्थना सादर केली.
स्वागत व प्रास्ताविक करताना अध्यक्ष विनायक मोरे यांनी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी “भारत को जानो” स्पर्धेचे महत्त्व आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा हल्लेप्पनवर यांनी केले, तर पवित्रा हल्लेप्पनवर यांनी तांत्रिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. विनायक घोडेकर, रामचंद्र तिगडी आणि पी. जे. घाडी यांनी स्कोअरर म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते
वरिष्ठ गट
- प्रथम : के. एल. एस. स्कूल
- द्वितीय : ज्योती सेंट्रल स्कूल
- तृतीय : अमृता विद्यालयम्
- विशेष पारितोषिके : महिला विद्यालय प्रभाताई देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल व जी. जी. चिटणीस स्कूल
कनिष्ठ गट
- प्रथम : अमृता विद्यालयम्
- द्वितीय : एम. व्ही. हेरवाडकर स्कूल
- तृतीय : जी. जी. चिटणीस स्कूल
- विशेष पारितोषिके : के. एल. एस. स्कूल व बालिका आदर्श विद्यालय
दोन्ही गटांतील प्रथम क्रमांक प्राप्त संघांची सिंधनूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यावेळी शहरातील ज्ञान प्रबोधन मंदिर, ज्योती सेंट्रल स्कूल, एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, के. एल. एस. स्कूल, अमृता विद्यालयम्, महिला विद्यालय, संत मीरा स्कूल, मुक्तांगण विद्यालय, सरस्वती गर्ल्स हायस्कूल, ठळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श विद्यालय, जी. जी. चिटणीस स्कूल, शारदा विद्यालय, भरतेश इंग्लिश मिडीयम स्कूल, गोमटेश समूहाच्या विविध शाळांसह एकूण २८ शाळांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी भारत विकास परिषदेचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामान्यज्ञान आणि राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत उपयुक्त असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
