बेळगाव : प्रसंगानुरूप व हजरजबाबी विनोद करण्याची कला ही आचार्य अत्रे यांची खासियत होती आणि त्यामुळेच त्यांचे विनोद आजही तितकेच लोकप्रिय आहेत, असे मत लेखक अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘आचार्य अत्रे आणि त्यांचे विनोदी विश्व’ या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजुकर व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी अनिल आजगावकर यांनी आचार्य अत्रे यांचे साहित्य, पत्रकारिता, नाटक व चित्रपट क्षेत्रातील योगदान विषद करत त्यांच्या गाजलेल्या विनोदांची रंगतदार मांडणी केली.
कार्यक्रमात अश्विनी पाटील, डॉ. श्रेयस चौगुले, रविंद्रनाथ जुवली, विजय वाईगडे, सुरेश खानोलकर, प्रभाकर देसाई, बाळकृष्ण बिर्जे, वनिता जोशी आणि उल्हास पानसे यांनी हिंदी, मराठी व कन्नड गीते सादर केली. तसेच भरत गावडे यांनी कविता सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र देसाई यांनी केले, तर शिवराज पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विठ्ठल पोलो यांनी आभार प्रदर्शन केले.
