तारीहाळ, जून २०२६ : तारीहाळ येथील ऐतिहासिक बडेकोळ मठ (बडेकोळ मठ नागय्या स्वामी मठ) परिसरातील शतकानुशतके जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘प्यास फाउंडेशन’तर्फे हाती घेण्यात आले आहे. मठ प्रशासन व भाविकांच्या तातडीच्या विनंतीला प्रतिसाद देत हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून आगामी सोमवती अमावस्येपूर्वी विहीर पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बडेकोळ मठ हे कर्नाटक तसेच शेजारील राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दर अमावस्येला येथे १० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः अधिक मासातील सोमवती अमावस्येला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सक्षम करण्याची गरज निर्माण झाली होती.
मठ परिसरातील पारंपरिक विहिरीत अनेक वर्षांपासून झाडांचा पालापाचोळा, निर्माल्य, गाळ व कचरा साचल्याने तिची पाणी साठवण क्षमता आणि उपयुक्तता कमी झाली होती. त्यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती.
मठ प्रशासनाच्या विनंतीनंतर ‘प्यास फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांनी त्वरित साफसफाई आणि पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली. या कामामध्ये विहिरीच्या बाजूने वाढलेल्या झाडांच्या फांद्या हटविणे, विहिरीतील गाळ काढणे, परिसराची डागडुजी व बळकटीकरण करणे तसेच भाविकांना सुरक्षितपणे पाणी वापरता येईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
बडेकोळ मठाचे मठाधीश श्री सद्गुरू नागेंद्रस्वामी यांच्या शुभहस्ते पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘प्यास फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, सचिव प्रिती कोरे, उपाध्यक्ष अभिमन्यू दागा, अवधूत सामंत, सूर्यकांत हिंडलगेकर तसेच अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतिनिधींनी पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन व पुनरुज्जीवन करण्याबरोबरच या भागातील समृद्ध जलवारसा जतन करण्यासाठी ‘प्यास फाउंडेशन’ कटिबद्ध असल्याचे सांगितले.
हे काम पूर्ण झाल्यानंतर पुनरुज्जीवित विहीर मठात दरमहा येणाऱ्या हजारो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचा विश्वासार्ह स्रोत ठरणार असून, हे कार्य केवळ तातडीची गरज भागविणारे नसून ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे.
