भारत विकास परिषदेची ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा ६ सप्टेंबरला
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बुधवार पेठ, टिळकवाडी येथील जीजीसी सभागृहात करण्यात आले आहे.
या स्पर्धेत कनिष्ठ विभागात सहावी ते आठवी आणि वरिष्ठ विभागात नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. एका संघात दोन विद्यार्थ्यांचा समावेश असेल. परिषदेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘भारत को जानो’ या पुस्तकावर आधारित प्रश्न स्पर्धेत विचारले जाणार आहेत. या पुस्तकात भारताच्या इतिहासाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
स्पर्धा एकूण चार फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. त्यानंतर प्रांतस्तरीय विजेत्यांना दक्षिण भारत विभागीय आणि विभागीय विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
दरम्यान, सहभागी सर्व शाळांमध्ये सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी भारताविषयी सामान्यज्ञानाची लिखित परीक्षा घेण्यात आली. देशभरात एकाच दिवशी होणाऱ्या या परीक्षेत सुमारे एक कोटी विद्यार्थी सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अध्यक्ष विनायक मोरे किंवा स्पर्धाप्रमुख विनायक घोडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भारत विकास परिषदेने केले आहे.
