मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांमधील वाद मिटला, परिसरात समाधानाचे वातावरण
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी गावातील टेकाकडील चव्हाटा मंदिराकडे जाणारा शेतवडीतील महत्त्वाचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांमधील वादामुळे बंद होता. मात्र, मध्यस्थी पंचांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हा वाद अखेर सामोपचाराने मिटला असून, रविवारी (१२ जुलै) रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्याच्या वादावर तोडगा काढण्यासाठी रवी पाटील, बाळाराम कदम, सुरेश पाटील, धोंडिबा पाटील आणि परशराम काकतकर यांनी मध्यस्थी पंच म्हणून पुढाकार घेत दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांशी अनेक फेऱ्यांत चर्चा केली. संयमाने आणि समन्वयाने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आणि दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेत रस्ता खुला करण्यास सहमती दर्शविली.
त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील अडथळे दूर करून मार्ग पूर्ववत करण्यात आला. दोन वर्षांपासून बंद असलेला हा रस्ता पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे-येणे सुलभ झाले असून शेतीची कामेही आता अधिक सोयीस्कर होणार आहेत.
यावेळी यशवंत महादेव गुरव, शिवाजी महादेव गुरव, रामचंद्र रवळू पाटील, प्रकाश यळ्ळूरकर, राजेंद्र मष्णू पाटील, विष्णू गुरव, रवळू गुरव, अशोक पन्हाळकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
रस्ता खुला झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी भविष्यात कोणतेही वाद सामोपचाराने सोडवून परस्पर सहकार्य आणि ऐक्याची भावना जपण्याचा निर्धार व्यक्त केला. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
