बेळगावातील उद्यमबाग येथील जयश्री फर्निचरचे मालक तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धामणे विभागातील ज्येष्ठ नेते यल्लाप्पा रेमाणाचे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत सापडलेली पैशांची बॅग आणि महत्त्वाची कागदपत्रे मूळ मालकाला परत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील चिखले येथील एक कुटुंब काल सायंकाळी फर्निचर खरेदीसाठी उद्यमबाग येथील जयश्री फर्निचर दुकानात आले होते. खरेदीदरम्यान त्यांच्या हातातील पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग अनावधानाने दुकानातच राहिली. काही वेळानंतर ही बाब लक्षात येताच संबंधित कुटुंबीयांनी बॅगेचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.
दरम्यान, आज सकाळी दुकान उघडल्यानंतर यल्लाप्पा रेमाणाचे यांच्या निदर्शनास ती बॅग आली. त्यांनी तत्काळ संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून बॅगेची खात्री केली. त्यानंतर बॅगेतील सुमारे 75 हजार 810 रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे त्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केली.
यल्लाप्पा रेमाणाचे यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.
