बीजगर्णी : बीजगर्णी गावातील प्रसिद्ध व ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या लक्ष्मी मंदिरासमोरील गटार तुंबल्याने सांडपाणी मंदिराच्या अंगणात साचत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, नागरिक व भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गटाराचे सांडपाणी साचल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरासारख्या धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या समस्येबाबत पंचायतमधील संबंधित व्यक्तींच्या निदर्शनास आणून देण्यात आले असूनही, समस्या त्यांच्या नजरेसमोर असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामदैवताच्या मंदिरासमोरील परिसराची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी
लक्ष्मी मंदिरासमोरील गटाराची तातडीने साफसफाई करून सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच भविष्यात गटार तुंबून पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, गावातील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणाऱ्या नागरिकांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे. गावातील समस्या मांडणे हा नागरिकांचा अधिकार असून, त्यावर योग्य ती कार्यवाही करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन गटाराची साफसफाई व पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
