बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील लॅब असिस्टंट शांताराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी झेंडा गीत सादर करून ध्वजाला अभिवादन केले. संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी त्यांना साथ दिली.
एनसीसी कॅडेट वैभवी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. एनसीसी प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे शांताराम पाटील यांचे स्वागत केले.
बालवाडीतील शिवांश विष्णू बांडगे, क्षितीज ज्ञानेश ओऊळकर, शार्दुल अंकुश केसरकर आणि सान्वी अश्विनकुमार पाटील यांनी विविध नेत्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. शिशुवर्गातील अन्वित अतुल सूर्यवंशी, शिवांजली महादेव मुतगेकर आणि पुनर्वी राहुल मोदगेकर यांनी विविध भाषांमधून आपले मनोगत व्यक्त केले. प्रांजल श्रीधर नावगेकर हिने मराठीत, वृंदा उमेश भांदुर्गे हिने कन्नडमध्ये, समृद्धी विनायक येळवे हिने इंग्रजीत, तर मनाली सुभाष बराटे हिने हिंदीत मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे शांताराम पाटील यांनी आपल्या मनोगतात सद्यस्थितीत स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले. बालवाडी शिक्षिका भारती शिराळे यांनी आभार मानले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, नृत्य आणि नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शाळेची पंतप्रधान मनाली सुभाष बराटे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्ती कुलकर्णी व वरदा देसाई यांनी केले.
