बेळगाव : संजीवनी फाउंडेशनमध्ये यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजात समानता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मदन बामणे, सल्लागार सदस्य संजय पाटील तसेच कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सल्लागार सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच श्रीफळ वाढवून पारंपरिक पद्धतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
यानंतर एच.आर. कावेरी लमानी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर समुपदेशक सरिता सिद्दी यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन मदन बामणे यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांचे जीवनकार्य, संघर्षमय प्रवास, शिक्षणाविषयीची भूमिका आणि भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान यावर सखोल प्रकाश टाकला. तसेच त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना ते आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना शिरहट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सावित्री माळी यांनी व्यक्त केले. यावेळी सुनिल चन्नदासर, अक्षता अक्कोळे, सचिन राठोड, अंकिता राजोरे, शशिकांत कांबळे, राधिका कलादगी, भूमी कणबरकर, बसम्मा बेनकट्टी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून संजीवनी फाउंडेशनने बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करत समाजात बंधुता, समानता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साह व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.
