बेळगाव : विश्व भारत सेवा समिती संचलित आदर्श विद्यामंदिर, अळवण गल्ली, शहापूर येथे जायंटस् ग्रुप ऑफ बेळगांव मेनच्या वतीने ३० गरजू विद्यार्थ्यांना नवीन स्कूल बॅग्जचे वितरण करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी गरीब परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन स्कूल बॅग खरेदी करणे शक्य नसल्याची बाब जायंटस् ग्रुप ऑफ बेळगांव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. शाळा सुरू होऊन महिना उलटूनही सुमारे ३० विद्यार्थी नवीन बॅगशिवाय शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
या विनंतीची तातडीने दखल घेत अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी समाजसेवक गिरीश शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट दर्जाच्या ३० स्कूल बॅग्जसाठी संपूर्ण आर्थिक मदत देण्यास तत्काळ सहमती दर्शविली. त्यानंतर जायंटस् ग्रुप ऑफ बेळगांव मेनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्जचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, शिक्षक जे. बी. पाटील, शिक्षिका भारता बागेवाडी, माधुरी कुलकर्णी, मनीषा शिनोळकर तसेच जायंटस् ग्रुप ऑफ बेळगांव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष अरुण काळे, मधु बेळगांवकर, सचिव विश्वास पवार, फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर, को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, ईश्वर पाटील, आनंद कुलकर्णी, दिगंबर किल्लेकर, विनोद आंबेवाडीकर, विजय बन्सुर, जयवंत पाटील, यलाप्पा पाटील, राहुल बेलवलकर, मोहन पत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने पुढे येण्याचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
