बेळगाव : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ एनडब्ल्यूकेआरटीसी (NWKRTC) बससेवा वापरणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य परिवहनच्या बसमध्ये मोफत बस पास दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी ज्यांनी बस पाससाठी पैसे भरले आहेत, त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण रक्कम परत दिली जाणार आहे.
सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शिक्षणासाठी राज्याच्या सीमाबाहेर जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने बेळगाव, निपाणी, खानापूरसह सीमाभागातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दररोज शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी बससेवेवर अवलंबून असलेल्या ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. वाढते प्रवासखर्च आणि पालकांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, तसेच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल, अशी प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
