बेळगाव : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी देशाच्या राजकीय प्रवाहाची दिशा स्पष्ट झाली असून, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये मतदारांचा कल ठळकपणे दिसून आल्याचे मत भाजप नेते किरण जाधव यांनी व्यक्त केले.
एकूणच निवडणुकीत मतदारांनी विकास, सुरक्षा आणि समानतेला प्राधान्य दिले. पश्चिम बंगालमध्ये मतदारांनी आपले हक्क आणि अस्तित्व जपण्याच्या दृष्टीने मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, राजकीय हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे हे मतदारांच्या निर्णयामागील प्रमुख घटक ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास या निकालांतून दिसून येतो. आगामी काळात इतर राज्यांतही याच प्रवाहाचा परिणाम दिसेल, असा विश्वास किरण जाधव यांनी व्यक्त केला.
