बेळगावातील एका धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याऐवजी एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील आझम नगर येथील अनुसूचित जाती कल्याण विभागाच्या पोस्ट मॅट्रिक मुलींच्या वसतिगृहात घडली.
हुक्केरी तालुक्यातील कटाबळी गावची कावेरी उमेश नायक (वय 21) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती बीएस्सी अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली तोच तिचा वाढदिवस होता. कावेरीचे लग्नही ठरले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
