बेळगाव, २ जुलै : बेळगाव–दिल्ली दरम्यानची दैनंदिन विमानसेवा १ जुलैपासून कमी करून आठवड्यातून केवळ तीन दिवस करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ऑक्टोबरपर्यंत लागू राहणारा हा बदल वाढते इंधन दर आणि आर्थिक कारणांमुळे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नवीन वेळापत्रकानुसार बेळगाव–दिल्ली विमानसेवा आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी उपलब्ध असेल. विमानाच्या उड्डाणाच्या आणि आगमनाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी, दररोजची सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
बेळगाव–दिल्ली मार्गाचा वापर व्यावसायिक, सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. आता थेट विमानसेवा दररोज उपलब्ध नसल्याने अनेकांना जोडणी (कनेक्टिंग) विमानांचा किंवा इतर वाहतूक पर्यायांचा आधार घ्यावा लागणार आहे. तसेच उपलब्ध जागा कमी झाल्याने विमानभाड्यात वाढ होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधीही १५ जूनपासून बेळगाव–बंगळुरू मार्गावरील दोनपैकी एक दैनंदिन विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांसाठी उपलब्ध पर्याय आधीच कमी झाले होते. त्यात आता दिल्ली विमानसेवेत झालेल्या कपातीमुळे वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय आणखी वाढली आहे.
सध्या बेळगावहून मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि दिल्ली या शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. मात्र, गेल्या वर्षभरात बंद झालेले इतर अनेक मार्ग अद्यापही पूर्ववत सुरू करण्यात आलेले नाहीत.
विमानसेवेची उपलब्धता सातत्याने कमी होत असल्याने भविष्यात आणखी काही मार्गांवरील सेवा कमी होण्याची भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देत बंद झालेल्या सेवा पुन्हा सुरू कराव्यात आणि विमानांची वारंवारता वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
