कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी व संवेदनशील परिस्थितीचे कारण; निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळाला परवानगी
बेळगाव, दि. २० जून :
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय (डीसी ऑफिस) असा मोर्चा काढण्याची मागणी केली होती. मात्र, शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, वाहतूक कोंडी आणि संवेदनशील भागातून मोर्चा जाणार असल्याचे कारण देत बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगळे यांनी ८ जून २०२६ रोजी दिलेल्या अर्जावर विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, विशेष शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून प्राप्त झालेल्या गुप्तचर अहवालांमध्ये प्रस्तावित मोर्चामुळे शहरातील विविध भाषिक समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आदेशात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी समितीच्या काही पदाधिकाऱ्यांवर व सदस्यांवर बेकायदेशीर आंदोलन, सार्वजनिक मार्ग अडविणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीचा आढावा घेताना या बाबींचाही विचार करण्यात आला.
तसेच, प्रस्तावित मोर्चाचा मार्ग शहरातील अतिवर्दळीच्या आणि संवेदनशील भागातून जात असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची, आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा निर्माण होण्याची आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कर्नाटक पोलिस अधिनियम १९६३ अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षा आणि नागरिकांच्या सोयीसाठी मिरवणुका व मोर्चांवर निर्बंध घालण्याचे अधिकार पोलिस प्रशासनाला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, समितीच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, परवानगीशिवाय मोर्चा किंवा रॅली काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
सार्वजनिक शांतता, सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने हा आदेश जारी करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.
