कंग्राळी बुद्रुक येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दत्ता पाटील, शंकर कोणेरी, नाथाजी पाटील, राजू मन्नोळकर, शिक्षणप्रेमी अमोल पाटील, शिक्षणतज्ञ युवराज पाटील, निलेश कोणेरी, नरेश कागणकर तसेच मुख्याध्यापक भांदुर्गे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तारोळकर सर यांनी केले तर अनुमोदन पी. ए. पाटील यांनी केले.
यावेळी शिक्षणप्रेमी अमोल पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व एसडीएमसी सदस्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अमोल पाटील हे दरवर्षी कंग्राळी, गौंडवाड , यमनापूर परिसरातील विविध शाळांमधील उत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करत असतात, तसेच विविध स्पर्धांनाही प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थ व शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याचप्रमाणे शिक्षक युवराज पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एचडीएमसी माजी अध्यक्ष शंकर कोणेरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शाळेच्या अडचणी मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिल्या. माजी उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणतज्ञ युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व, मोबाईलचे दुष्परिणाम आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा समारोप यूपी चौगुले यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.
