बेळगाव : संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेत गेल्या सहा वर्षांपासून अन्नपूर्णा म्हणून स्वयंपाकाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या जमुना कडोलकर यांचा मदन बामणे यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना चेअरमन मदन बामणे यांनी कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. जगभरातील कष्टकरी व कामगारांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे सांगत त्यांनी कोणताही देश किंवा समाज केवळ बोलण्याने नव्हे तर कामगारांच्या घाम आणि मेहनतीवर उभा राहतो, असे प्रतिपादन केले. घर बांधणाऱ्या गवंड्यापासून, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत, स्वच्छता राखणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचार्यांपर्यंत प्रत्येकाचा देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कामगार हा समाजाचा कणा असून त्यांच्या कष्टांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता न ठेवता वर्षभर राखला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. “तुमच्या प्रामाणिक सेवेच्या जोरावरच आम्हाला गरजू रुग्णांची सेवा करता येते,” असे सांगत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशासक पद्मा औषेकर, एचआर कावेरी लमाणी, समुपदेशक सरिता सिद्दी आणि सुनिल चन्नदासर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सावित्री माळी यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन अक्षता अक्कोळे यांनी केले.
