बेळगाव : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने प्रवेश मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
31 मे 2026 रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर जल्लोष, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, फटाके फोडणे, धोकादायक वस्तूंचा वापर करणे तसेच बाईक रॅली, स्टंटबाजी आणि अतिवेगाने वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह, चिथावणीखोर किंवा द्वेषपूर्ण संदेश प्रसारित करू नयेत. कोणत्याही संघाच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण होईल असे वर्तन टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
शहरभर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष कारवाई केली जाणार आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ₹10,000 दंड व सहा महिन्यांपर्यंत कारावास, तर पुनरावृत्ती झाल्यास ₹15,000 दंड व दोन वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे.
