बेळगाव : कपिलेश्वर मंदिरामागील तळ्याच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
३ मे २०२६ रोजी या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तळ्याच्या कठड्याची भिंत कोसळल्यामुळे हा अपघात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ४ मे रोजी तळ्याच्या दुसऱ्या बाजूची भिंतही कोसळून जवळील घरांना धोका निर्माण झाल्याचे पत्रात म्हटले आहे.
सदर जमीन पूर्वी गोडसे कुटुंबाच्या मालकीची असून ती नंतर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित तळ्याचे संरक्षण व दुरुस्तीची जबाबदारी महानगरपालिकेने तत्काळ पार पाडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात, असा इशाराही समितीने दिला आहे. नागरिकांच्या जीवितास धोका टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, खजिनदार शिवाजी मंडोळकर आणि उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर , सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले, विकास कलघटगी यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
