बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सीमाभागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.
माहितीनुसार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सुमारे 865 गावांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण ट्युशन फी माफी, तर विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी 25 टक्के फी सवलत देण्यात येणार आहे. तसेच वसतिगृह शुल्कातही सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा नाही, त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्जासाठी विद्यार्थ्यांनी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी:
👉 https://www.unishivaji.ac.in/mscAdmission/For-StudentInformation
तसेच, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच बेळगाव येथे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे.
या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
