बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळ संघाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते येत्या २८ फेब्रुवारी रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावर्षीच्या कार्यक्रमासाठी ‘मराठी भाषा आणि अभिजातपण’ हा विषय निश्चित करण्यात आला असून या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मिरज येथील प्रसिद्ध कवी व समीक्षक यांना आमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानातून मराठी भाषेचे वैभव, परंपरा आणि अभिजातपणा यांचा सखोल ऊहापोह होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बैठकीत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक उपक्रमांची रूपरेषाही निश्चित करण्यात आली. दर महिन्याला बेळगावातील एका कवीला समजून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्याचा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या माध्यमातून स्थानिक कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि साहित्यिक संवाद वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न संघाकडून सातत्याने केला जाणार आहे.
बैठकीस संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर, सचिव सुधाकर गावडे, व्ही. एस. वाळवेकर, उर्मिला शहा, रेखा गद्रे, अस्मिता आळतेकर, स्मिता किल्लेकर, अस्मिता देशपांडे, प्रा. निलेश शिंदे, जितेंद्र रेडेकर, अॅड. नितीन आनंदाचे, चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते.
