बेळगाव : वडगाव नजर कॅम्प परिसरात असलेल्या सुमारे १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्यास फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. वारसा जतन करण्याबरोबरच शाश्वत जलस्रोत मजबूत करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
कुरुंदवाड सरकारच्या काळात बांधण्यात आलेली ही विहीर त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना आहे. पूर्णपणे दगडी बांधकामातून साकारलेली ही विहीर एकेकाळी संपूर्ण वडगाव गावाचा मुख्य जलस्रोत होती. अनेक नैसर्गिक झऱ्यांमुळे ही विहीर वर्षभर कधीही कोरडी न पडता पिण्यायोग्य पाण्याचा मुबलक पुरवठा करत असे. आजही गावातील ज्येष्ठ नागरिक या विहिरीचे महत्त्व आठवून तिच्या वैभवशाली इतिहासाच्या आठवणी सांगतात.
कालांतराने दुर्लक्षामुळे ही ऐतिहासिक आणि जीवनदायी रचना जीर्ण झाली व अखेर पूर्णतः मुजली गेली. मात्र तिचे ऐतिहासिक महत्त्व आणि सध्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन प्यास फाउंडेशनने एकेपी फेरोकास्ट कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अनुदानाच्या माध्यमातून या विहिरीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प केला आहे. या प्रकल्पाचा उद्देश केवळ जलस्रोत पुनर्संचयित करणे नसून, परिसराच्या सांस्कृतिक व स्थापत्य वारशाचे जतन करणे हाही आहे.
या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ बेळगाव शहराचे महापौर श्री. मंगेश पवार, एकेपी फेरोकास्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पराग भंडारे, श्रीमती प्रीती भंडारे व श्री. देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, सचिव डॉ. प्रीती दोड्डवाड, उपाध्यक्ष श्री. अभिमन्यू दागा, कोषाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पसारी, जॉईंट सेक्रेटरी श्री. दीपक ओऊळकर, सभासद श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. अवधूत सामंत, श्री. रोहन कुलकर्णी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पुनर्संचयित झाल्यानंतर ही ऐतिहासिक विहीर पुन्हा एकदा विश्वासार्ह जलस्रोत म्हणून कार्य करेल, तसेच पर्यावरणीय जबाबदारी, सामुदायिक सहभाग आणि वारसा जतन यांचे प्रभावी प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
