बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीने येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘काळा दिना’निमित्त महिलांना मोठ्या संख्येने मूक सायकल फेरीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच महिला आघाडीची विशेष बैठक पार पडली.
बैठकीत अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर यांनी सांगितले की, “सन १९५६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून कर्नाटक राज्य स्थापनेची घोषणा केली आणि त्यात बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना जबरदस्तीने कर्नाटकमध्ये डांबण्यात आले. त्या अन्यायाच्या विरोधात सीमाभागातील जनता आजही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा देत आहे. या लढ्यात महिलांनीही पुढाकार घेत काळ्या दिनी मूक सायकल फेरीत सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले.
महिला आघाडीच्या सेक्रेटरी सौ. सरिता पाटील यांनी महिलांना ‘काळ्या दिना’चे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. “महिलांनी काळी साडी परिधान करून किंवा काळी फीत बांधून आंदोलनात सामील व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
उपाध्यक्षा सौ. सुधा काकडे यांनीही महिलांच्या एकजुटीचा संदेश देत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या बैठकीस सौ. भाग्यश्री जाधव, विजया कुडवी, अर्चना कावळे, प्रभावती सांबरेकर, कोमल पाटील, सविता काकतकर, माला जाधव, आशा पाटील, अरुणा शिंदे, राजसी बांबुळकर, शामिनी पाटील, विजया शानबाग, लक्ष्मी कुरणे, अनुपा पाटील, प्रथा पिंगुळे, सुनीता कंग्राळकर, इंदू घोरपडे, सुजाना बामुचे, कांचन अळकुंदकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला आघाडीच्या या तयारीमुळे बेळगावमध्ये १ नोव्हेंबर रोजीचा ‘काळा दिन’ अधिक प्रभावी ठरणार आहे.
#Belgav #BedhadakBelgav
