बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे आज दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने सीमा भागावर शोककळा पसरली आहे. सीमा प्रश्नासाठी गेल्या अनेक दशकांपासून सक्रियपणे लढा देणारे एक मजबूत नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
दीपक दळवी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सीमा भागात तसेच महाराष्ट्र एकीकरणाच्या चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सीमा लढ्यातील त्यांच्या योगदानाची आठवण करत विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या दुःखद घटनेमुळे मराठा समाजातील होतकरू मंडळींची नियोजित बैठक रद्द करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
