आंबेवाडी गावात शिवछत्रपतींच्या मूर्तीची ऐतिहासिक प्रतिष्ठापना, शिवभक्तांच्या जयघोषात गाव शिवमय

आंबेवाडी गावात शिवछत्रपतींच्या मूर्तीची ऐतिहासिक प्रतिष्ठापना, शिवभक्तांच्या जयघोषात गाव शिवमय

आंबेवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन मूर्तीची ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली. सकाळी आदरणीय श्री. संभाजी भिडे गुरूजी यांच्या पवित्र हस्ते मंत्रोच्चार, वैदिक विधी आणि धार्मिक परंपरेनुसार हा विधी पार पडला. यावेळी संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला.

या भव्य सोहळ्याला माजी आमदार श्री. संजय पाटील, माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष (हिंडलगा) श्री. नागेश मुन्नोळकर, युवा नेते महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री. आर. एम. चौगुले (मण्णूर), चेतन पाटील (माजी ग्रामपंचायत अध्यक्ष), किरण गावडे व परशराम कोकीतकर (जिल्हा प्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान) यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याचा गौरव अधिकच वाढला.

यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यामुळे संपूर्ण आंबेवाडी गाव शिवमय झाले. ही प्रतिष्ठापना केवळ मूर्ती उभारणी न राहता शिवविचार, स्वराज्याची प्रेरणा आणि पुढील पिढीसाठी आदर्श ठरलेला ऐतिहासिक क्षण ठरला.

संध्याकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमास कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा. श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी युवा नेतृत्व मृणाल हेब्बाळकर, काडा अध्यक्ष युवराज कदम, ग्रामपंचायत आंबेवाडीचे उपाध्यक्ष श्री. आनंद तुडयेकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संध्याकाळचा कार्यक्रम दिमाखदार झाला.

कार्यक्रमात बोलताना मा. लक्ष्मीताई हेब्बाळकर म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझा श्वास आहेत. त्यांच्या विचारांवर चालत विकासाची कामे करणे हेच माझे ध्येय आहे. या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी दिलेली देणगी ही माझी नसून महाराजांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे.” त्यांच्या या भावनिक शब्दांनी उपस्थित शिवभक्त भारावून गेले.

या वेळी प्रमुख वक्ते श्री. अरविंद लक्ष्मणराव पाटील, प्राचार्य म. म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर यांनी शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजी अतिवाडकर होते. तर मूर्ती प्रतिष्ठापना संकल्प समितीचे चेअरमन श्री. संजय तरळे यांनी संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.

कार्यक्रमादरम्यान लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी तुळशीपत्रे व फुलांचे हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सामूहिक जयघोष करत शिवविचार अखंड प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प केला.

या ऐतिहासिक शिवप्रतिष्ठापनेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. ही शिवप्रतिष्ठापना आंबेवाडीच्या इतिहासातील अभिमानाचा सुवर्णक्षण ठरली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार आणि स्वराज्याची प्रेरणा पिढ्यान्‌पिढ्या जिवंत ठेवणारी ठरणार आहे, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − seven =

error: Content is protected !!