बेळगाव: शहर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दारू, गांजा, अफू व इतर गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी अलीकडेच कारवाई करून अटक केल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असताना, आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही अशाच कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहापूर, येळ्ळूर, वडगाव, अनगोळ, शिलारस आदी शिवारांमध्ये शेतीत वाढलेल्या गैरप्रकारांमुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पिकाऊ शेती, रब्बी पिके, बांधावरील तूर, वाळलेल्या चाऱ्याचे गंजी आणि झाडाझुडपांच्या आडोशाला काही जण दारू, बिअर, गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करत बसतात. काही जण हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेऊन येत पार्ट्या करतात. या वेळी महिलावर्ग शेतीकामासाठी गेल्यास त्यांना धिंगाणा पाहून भीतीने परत जावे लागते. अनेकदा संबंधितांमध्ये भांडणे होऊन बिअरच्या बाटल्या फोडल्या जातात. त्यातील काचा व कचरा शेतातच टाकून दिला जातो. परिणामी तो कचरा साफ करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर येते.
दिवसासोबतच रात्रीही असे प्रकार घडत असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रब्बी पिके, बांधावरील तूर तसेच इतर पिकांची चोरी होत असून काही ठिकाणी गवताच्या गंजींनाही आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही दिवसांत बोअरवेल मोटारींच्या वायरिंगसह इतर साहित्य चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शेतात येऊन पाहणी केली व तपास सुरू असल्याचे सांगितले; मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे
