खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील बसशेड गेली अनेक वर्षे रंगरोटीअभावी जीर्ण अवस्थेत होते. गाववस्तीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असल्याने या ठिकाणी मद्यपींचा अड्डा तयार झाला होता. परिणामी परिसर अस्वच्छ व दुर्लक्षित झाला होता.
होळी सणाचे औचित्य साधत गावातील काही उत्साही युवकांनी पुढाकार घेत बसशेड परिसराची स्वच्छता मोहीम राबवली. झाडाझुडपांनी व्यापलेला परिसर श्रमदानातून स्वच्छ करण्यात आला. तसेच युवकांनी स्वखर्चाने बसशेडची रंगरोटी करून त्याला नविन रूप दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे बसशेड आता स्वच्छ, सुंदर आणि प्रवाशांसाठी सुरक्षित बनले आहे.
युवकांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे गावकऱ्यांनी व ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी मनापासून कौतुक केले. या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुहास यांचे मार्गदर्शन लाभले. सौरभ पाटील, वेदांत पाटील, प्रेमानंद पाटील, सर्वोत्तम पाटील, कार्तिक पाटील, धीरज पाटील, गणेश पाटील, अंकुर पाटील आणि भरमु पाटील यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून श्रमदान केले.
चन्नेवाडीतील युवकांच्या या कौतुकास्पद कार्यामुळे गावात सामाजिक जाणीव आणि एकतेचा संदेश पसरला आहे.
