बेळगाव, ६ ऑक्टोबर – भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा टिळकवाडी येथील बुधवार पेठेतील जी. जी. सी. सभागृहात होणार आहे.
या स्पर्धेत कनिष्ठ विभागात सहावी ते आठवी आणि वरिष्ठ विभागात नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. प्रत्येक संघात दोन विद्यार्थी असतील. प्रश्नमंजुषेत परिषदेतर्फे प्रकाशित ‘भारत को जानो’ या पुस्तकातील प्रश्न विचारले जाणार असून या पुस्तकात भारताच्या इतिहासाची सखोल माहिती समाविष्ट आहे.
स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये पार पडणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. पुढील टप्प्यात प्रांतस्तरीय विजेते दक्षिण भारत विभागीय आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील.
अधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख डॉ. जे. जी. नाईक किंवा प्रा. अरुणा नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी कळविले आहे.
