मालवण, दि. १५ मार्च २०२६ : मालवण तालुक्यातील किल्ले भगवंतगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण काम करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान सिद्धेश्वर मंदिराच्या मागील बाजूस जमिनीत गाडलेला दरवाजा शोधून काढण्याचा आणि त्याला पुन्हा उजेडात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या दरवाजाला नवसंजीवनी देण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या हाती घेतले.
या उपक्रमात मुंबई, रत्नागिरी आणि रायगड विभागातील दुर्गवीर व दुर्गवीरांगनांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करत किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपला मोलाचा हातभार लावला.

दरम्यान, किल्ल्यावर अजूनही अनेक वास्तू संवर्धनाच्या प्रतीक्षेत असल्याचे निदर्शनास आले. यासाठी अधिकाधिक स्वयंसेवकांची गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले असून, पुढील मोहिमांमध्ये सहभागी होऊन आपल्या ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
“सेवेचे ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर” या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
