बेळगाव : तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत वळवून बेळगाव शहरासह तालुक्यातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेने चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी नगरसेवक संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील, विशेषतः बेळगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत वळविण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दोन्ही राज्यांच्या सरकारांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास बेळगावच्या पाणीपुरवठ्यासह शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी मोठा दिलासा मिळू शकतो.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वीज निर्मितीनंतर शिल्लक राहणारा पाणीसाठा राखून उर्वरित पाणी मार्कंडेय नदीत सोडल्यास नदी वर्षभर प्रवाही राहण्यास मदत होईल. याचा फायदा बेळगाव शहरातील नागरिकांबरोबरच तालुक्यातील शेतकऱ्यांनाही होणार असून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागू शकतो.
या मागणीसाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती संघटनेने केली आहे.
या निवेदनावर माजी महापौर शिवाजी सुंठकर तसेच माजी नगरसेवक दीपक वाघेला, अमर येळ्ळूरकर आणि सुनील बाळेकुंद्री यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
