बेळगाव : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर लाखो लोकांच्या सह्यांची व्यापक मोहीम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुका व शहर पातळीवर सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध भागांत कार्यकर्ते सक्रियपणे सहभाग नोंदवत आहेत.
याच मोहिमेचा भाग म्हणून आज पांगुळ गल्ली येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोतेष बारदेशकर यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सीमा प्रश्नाबाबत आपली भूमिका नोंदवली.
यावेळी गल्लीतील पंच अरुण मुतकेकर, अनंत कुचेकर, सुरज मुतकेकर, सुनील मुतकेकर, सचिन भातकांडे, नितीन शिंदे, अमित अंनगोळकर, आकाश टक्केकर, राजू जाधव तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सीमा प्रश्नाच्या न्याय्य तोडग्यासाठी ही सह्यांची मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
