बेळगाव : शहरातील भातकांडे गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या अनगोळकर बंधू यांच्या मालकीच्या धोकादायक इमारतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून भिंतींना तडे गेलेले आहेत. त्याचबरोबर उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
महापालिकेकडून कचरा वेळेत उचलला जात नसल्याने येथे कचऱ्याचे ढिगारे साचू लागले आहेत. त्यामुळे दुर्गंधी, डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरी आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सातत्याने अशा घटना घडत असल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर जागेचे मालक तसेच संबंधित वार्डाचे नगरसेवक यांना बोलावून प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी भातकांडे गल्लीतील समाजसेवक निहाल दादा शहापूरकर, विनायक बेळगावकर, श्रीकांत कडोलकर, श्री लोहार, अनंत भातकांडे, राहुल शिंदोळकर तसेच अन्य रहिवासी उपस्थित होते.
रहिवाशांनी तातडीने इमारतीबाबत योग्य ती कारवाई करावी, परिसरातील कचरा नियमितपणे उचलावा आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
