बेळगांव – पाण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या प्यास फाऊंडेशन बेळगांव या संस्थेच्या कार्याचा गौरव टीचर्स कॉलनी दत्त मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आला. संस्थेने आतापर्यंत लहान-मोठे १३ तलाव आणि ४ विहिरी पुनर्जीवित करून लोकांच्या उपयोगासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याच कार्याचा भाग म्हणून टीचर्स कॉलनी दत्त मंदिर परिसरातील तब्बल १५० वर्षे जुनी आणि पूर्णपणे पडझड झालेली विहीर पुनर्बांधणी करून पुन्हा भक्कमपणे उभी करण्यात आली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल प्यास फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, सेक्रेटरी डॉ. प्रिती कोरे, खजिनदार लक्ष्मीकांत पसारी, सभासद रोहन कुलकर्णी व सूर्यकांत हिंडलगेकर यांचा शाल, फुले व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. माधव प्रभू यांनी पाण्याचे वाढते महत्त्व आणि जलसंधारणाची गरज याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रिती कोरे यांनी विहीर पुनर्जीवनासाठी सहकार्य केलेल्या ए के पी फेरोकास्टचे पराग भंडारे व प्रीती भंडारे यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमानंतर प्यास टीमच्या हस्ते आरती करण्यात आली.
या प्रसंगी दत्त मंदिर सेवा समितीचे के. सी. मोदी, वाय. एम. सुळेभावी, एस. एच. मधलूर, वी. आर. गुडी, एस. एन. तावरे, श्रीकृष्णा सराफ, सागर सुळेभावी, माधव देशपांडे, विनोद मात्तिकोप, श्रीनिवास भस्मे, गिरीश महाजन यांच्यासह कॉलनीतील महिला-पुरुष व इतर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्यास फाऊंडेशनच्या या कार्यामुळे परिसरातील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून नागरिकांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
