बेळगावकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि बहुप्रतीक्षित ‘अन्नोत्सव २०२६’चा भव्य शुभारंभ शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अंगडी कॉलेज मैदानावर उत्साहात पार पडला. शहरातील खाद्यप्रेमींनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला.
रोटरी जिल्हा गव्हर्नर रो. अरुण भंडारे यांच्या हस्ते रिबन कापून अन्नोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एजी रो. राजेशकुमार तळेगाव, श्रीमती दीपा सिदनाळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विनायक नाईक, सचिव रो. डॉ. संतोष बी. पाटील, कम्युनिटी सर्व्हिसेस डायरेक्टर रो. मुकुंद बंग आणि अन्नोत्सवाचे चेअरमन रो. मनोज मायकल हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या अन्नोत्सवात देशभरातून आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले असून मुघलाई पदार्थ, कोस्टल सीफूड तसेच भारताच्या विविध भागांतील खास आणि पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी उसळली आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना रो. अरुण भंडारे यांनी रोटरी क्लबच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. अन्नोत्सवातून जमा होणारा निधी सार्वजनिक स्वच्छतागृहे, ‘स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड’ यासह विविध सामाजिक प्रकल्पांसाठी वापरण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. श्रीमती दीपा सिदनाळ यांनीही बेळगावकर वर्षभर वाट पाहत असलेल्या या महोत्सवाच्या सातत्यपूर्ण आयोजनाचे विशेष कौतुक केले.
उद्घाटनाच्या पहिल्या संध्याकाळी रुशांत यांनी सादर केलेल्या ‘सुफी रेट्रो’ गीतांच्या कार्यक्रमाने वातावरण संगीतमय झाले. पुढील काही दिवसांत बॉलिवूड व हॉलिवूड थीमवर आधारित विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या अन्नोत्सवाचा लाभ बेळगावकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रो. विनायक नाईक आणि चेअरमन रो. मनोज मायकल यांनी केले आहे. महोत्सवाची तिकिटे ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे उपलब्ध असून, अन्न, संगीत आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारा हा उत्सव पुन्हा एकदा बेळगावकरांच्या मनात खास स्थान निर्माण करीत आहे.
